दसरा :- २०१६
हिंदू संस्कृतीनुसार दसरा म्हणजे साडेतीन मुहुर्तापैकी एक. हीच ऐतिहासिक संस्कृती दुर्गवीर परीवार सातत्याने जपतो. गेल्या वर्षीसुद्धा दसरोत्सवात मी सामिल झाले होते परंतु या वर्षीचा काही “विषेश” च होता.
आता तुम्हाला वाटेल कि दसरा काय तो सर्वच साजरा करतात, पण यावर्षी खरच विशेष होता कारण मला आणि माझ्या दुर्गवीर परीवाराला एक “नवीन सदस्य” जवळून पाहणार होती ती म्हणजे माझी आई ! हो आई जी मला सर्व गोष्टीत प्रोत्साहन देऊन सहकार्य करते ती “माझी आई”. तीला ह्या या मोहिमेची “खास पाहुणी” म्हणून उपस्थित रहायचा मान मिळाला. तस पाहिले तर माझ्या आईला मुलगी कामावरुन आल्यावर सतत सोबत रहावी असे वाटते का ते कदाचित तिचे ते प्रेम असावे. असो पण मोहिमेला निघताना काळजीने ओरडायची पण मनातुन नेहमी आशिर्वाद देवुनच पाठवत होती. माझे तसे दुसरे वर्ष दसरा सोहळ्याचे पण आकर्षण इतके कि, कधी एकदा दसरा येतो आहे असे झाले होते. पाहता पाहता तो दिवस तो उजाडलाच, आई सोबत असल्याने थोडा उशिर होणारच होता तो झालाच घाईत एकदाचे विरारला पोहचलो पण गितुताई आणि नितीनजींचा (प्रेमळ) ओरडा खाल्याशिवाय प्रवास सुरू कसा होणार आणि कारण देणे हा स्वभावच माझा...
हा विजयोत्सव या वर्षी अर्नाळ्याच्या जंजि-यात साजरा होणार होता. उपस्थिती पण तशी २५ जणांची होती. इतिहासातील अर्नाळा किल्ला समुद्राच्या थोड्या पलिकडे नारळाच्या बनात दडलेला. डावीकडे गोल बुरूज आणि उजवीकडे नविनच बांधलेले मंदिर. बोटीतून रम्य दृश्य दिसत होते किना-यालगतच लाटांचे वार झेलत डौलाने उभ्या असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. पोहचल्यावर सर्वांनी जोशाने कामाला सुरुवात केली. महादरवाजा आणि आतील परीसर साफसफाई करायला सुरूवात केली. यात खास पाहुणी(आई) सहभागी होतीच. शिवकाळात सणासुदिला गड जसे सजवले जात तसे वातावरण निर्माण झाले होते. महादरवाजात आम्ही पाण्याचा सडा मारून रांगोळी काढत फुलांनी गड सजवले. मग आम्ही पांरपारिक वेशभुषा करून छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक मुर्तीचे पुजन केले. पुजन आटोपल्यावर नितीनजींच्या गगनभेदि गर्जनेने शिवमय वातावरण निर्माण केले. गडाचा इतिहास किशोर दादांनी सांगायला सुरुवात करुन त्या शिवमय वातावरणात भर टाकली. समुद्रावर राज्य गाजविण्यासाठी १५१६ मध्ये सुलतान बेगडाने टेहाळण्यासाठी बांधकाम केले. काळानुसार योग्य वाटेल तसे अनेक बांधकाम करत सुधारणा करण्यात आली.
खर तर असे बांधकाम विशेष कारणासहीत केले जाते. तसाच चौकोनी आकाराचा सागराच्या लाटाने वेढलेला उंच व रूंद गडाचे तट एवढे संकट सहन करत अजूनही मजबूत असल्याचे सांगत होते. पण स्थानिक आमचे कोळी बांधव आता मासळी सुखविण्यासाठी करतात तो भाग वेगळा.
इतिहास ऐकत वेळ कसा गेला कळलेच नाही पण समाधान वाटले. प्रत्येकाचा आनंद गगनात मावत नव्हता. आम्ही सजवलेल्या गडाला स्वत:च रुप पाहुन हायसं वाटल असावं. मनोमन आभार मानत असेल त्या दुर्गवीरांचे ज्यांनी हा सण साजरा करून त्याचे जुन वैभव अनुभवल. त्याच जोशात पारंपारीक वेशातील शिव गर्जनानी सारा आसमंत दणाणून सोडत आसमंत आणि गडाची जणू भेटच करून दिली असावी. हा सर्व वेगळा नजराना माझ्या आईसाठी नवीन आणि सुखदच होता त्यातच स्थानिक कोळीआजीने केलेला कोळी पध्दतीचे जेवणानी लोणच्याची चवच ह्या प्रवासाला देऊन गेली
हा सुखद दसरा विशेष मी , आई आणि सर्व दुर्गवीर परीवार अनुभवत निघालो. प्रत्येकांच्या चेह-यावर विशेष तेज होते. पण मला माझ्या आईच्या चेह-यावर तेज आणि माझ्याबद्दल असलेला अभिमान माझ्यासाठी सुखद होता. तसे हा अनुभव देणा-या दुर्गवीर परिवार सदस्यांचे विशेष आभार मानावे ते थोडे !मी पण या दुर्गवीर परिवाराची एक सदस्य असल्याचा मला खूप गर्व आणि अभिमान आहे.🙏
जय शिवराय
No comments:
Post a Comment